राज्यात पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा एक डिसेंबरपासून सुरू 

राज्यात पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा एक डिसेंबरपासून सुरू 
मुंबई - 
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा एक डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलाय. पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू कराव्यात की नाहीत, याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू होते. अखेर मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. मात्र, शाळा सुरू करत असताना विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असेल. 

राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सने देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातील करोना रुग्ण संख्या कमी होऊ लागल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या.