सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी दोन गटात विभागली

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज सोमवारी (ता. २७ मार्च) काँग्रेसच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला आहे.

सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी दोन गटात विभागली

काँग्रेसच्या डिनर पार्टीवर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली, दि. २८ मार्च - स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे. खरे तर राहुल गांधी यांचे सदस्यत्व काढून घेतल्यापासून काँग्रेस पक्ष केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहे. याच अनुषंगाने काँग्रेसने रविवारी एकदिवसीय संकल्प सत्याग्रहाचे आयोजन केले होते. त्यानंतर आज सर्व विरोधी पक्षनेत्यांनी काळ्या कपड्यात संसदेत पोहोचून निषेध केला.

यानंतर आज रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे. ठाकरे गटाचा कोणताही नेता या डिनर पार्टीला उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याला दुजोरा दिला.

संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर अस्वस्थतेमुळे शिवसेनेचे उद्धव गटाचे खासदार या डिनरला उपस्थित राहणार नाहीत. लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान एका पत्रकाराने राहुल गांधींना प्रश्न विचारला की, जेव्हा हे लोक 'माफी मागा' म्हणतात तेव्हा राहुल गांधींना काय वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, 'राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे.'

दरम्यान, या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. तर याच मुद्द्यावरून मालेगावच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांची कानउघडणी सुद्धा केली आहे. सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांनी १४ वर्षे अनन्वीत अत्याचार सहन केले आहेत. त्यांचा अपमान आपण सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मालेगावमधील सभेतून सांगितले. तर, दुसरीकडे वीर सावरकर आमच्यासाठी आणि देशासाठी श्रद्धेचा विषय आहेत.

अंदमानात १४ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशी टीकेला जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्ताची पुष्टी केली.

दरम्यान, आता या नव्या मुद्द्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामधील या वादावर काही तोडगा निघणार की भविष्यात याचे काही वेगळे परिणाम पाहायला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. कारण याआधी देखील महाविकास आघाडीमध्ये काहीही ठीक नसल्याचे समोर आले होते. तर महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात होते. ज्यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुद्दा महाविकास आघाडीमध्ये फूट पाडतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.