अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनो, 'ही' बातमी तुमच्यासाठीच ! नुकसानीची पूर्वसूचना दिल्यावरच मिळणार भरपाई, 'अशी' आहे प्रक्रिया

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनो, 'ही' बातमी तुमच्यासाठीच ! नुकसानीची पूर्वसूचना दिल्यावरच मिळणार भरपाई, 'अशी' आहे प्रक्रिया
लातूर -
रब्बी हंगामातील पीके बहरात असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह विदर्भातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता भरपाईची मागणी होत आहे. मात्र, या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीकडे सादर कराव्या लागणार आहेत. तरच भरपाईची प्रक्रिया होणार आहे. पिकांचे नुकसान झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांना ह्या पूर्वसूचना सादर कराव्या लागणार आहेत. मात्र, अनेक शेतकरी याबाबत अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या 6 पध्दतीने पूर्वसूचना ह्या सादर करता येणार आहेत.

० हे आहेत पूर्वसूचना सादर करण्याचे पर्याय
1. क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop insurance app) केंद्र शासनाच्या  Crop Insurance- https#//play.google.com/store/apps/details ? हे ऍप फोनमध्ये Install करुन समोर येणाऱ्या सूचनांद्वारे आपली योग्य माहिती भरावी लागणार आहे.
2. विमा कंपनीच्या 1800 2660 700 या टोल फ्री क्रमांकावर पूर्वसूचना देता येणार आहे.
3. विमा कंपनीच्या pmfby.gov.in या ई-मेलवर
4. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय (insurance company office)
5. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय (circle officer)
6. ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा (bank branch)

० रब्बी हंगमातील या पिकांना अवकाळीचा फटका
रब्बी हंगामातील पेरण्या महिनाभराने उशिरा झाल्या आहेत. मात्र, पेरणीपासूनच या पिकांवर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. पेरणी होताच झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले होत तर आता पीके जोमात असतानाच झालेल्या अवकाळी व गारपिटमुळे ज्वारी, गहू, हरभरा, राजमा सुर्यफूल या पिकांचे नुकसान झाले आहे. 30 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला अशा शेतकऱ्यांना पूर्वसूचना दाखल करता येणार आहेत.

० विदर्भ, मराठवाड्यात पावसानेच वर्षअखेर 
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची हजेरी लागली. तर सहा ते सात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. 31 डिसेंबर रोजीही विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदीया या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली, आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ३१ डिसेंबरलाही पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यातले हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.