मालिशमुळे वारकरी सुखावले... दिवेघाटात चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू पु

मालिशमुळे वारकरी सुखावले... दिवेघाटात चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू पु

पुणे , (प्रबोधन न्यूज )   -  दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज केली. या आगळ्यावेगळ्या मसाज सेवेने वारकरी सुखावले आणि उत्साहाने पुढे मार्गस्थ झाले. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा म्हणत अनेक लोक वारकऱ्यांची मसाज करुन देण्यासाठी पुढे येतात. 

योग विद्याधाम पिंपरी चिंचवडतर्फे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधक मसाज करुन देतात. एकावेळी साधारण 50 महिला आणि  50 पुरुष वारकऱ्यांचा मसाज होतो. यंदा या वारीत सहा ते सात हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगगुरू प्रमोद निफाडकर आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने, ऐश्वर्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मसाज सेवा गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे.

शेकडो किलोमीटरची पायी वारी करताना पाय थकतात. अशावेळी वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून देण्याची संकल्पना आमच्या कार्यकर्त्यांनी मांडली आणि हा उपक्रम सुरु झाला. पुणे-सासवड हा लांबचा पल्ला; त्यातही दिवेघाटाची अवघड वाट चालून वर आल्यावर मन आनंदी असले, तरी पायांना थकवा येतो. मसाज करून पाय मोकळे करावेत आणि मानसोबत पायही त्याच आनंदाने पुढे चालावे, या उद्देशाने ही सेवा देत आहोत. पांडुरंगाची चरणसेवा केल्याची अनुभूती आम्हाला मिळते, असं प्रमोद निफाडकर यांनी सांगितलं. शंभर ते दीडशे योगसाधक ही सेवा देतात. वारकऱ्यांना यातून सुखद आनंद मिळतो. वारीत पाण्यासह भोजन, औषधे, खाद्यपदार्थ आणि अन्य गोष्टी मिळतात. पण अशी अनोखी सेवा दिवेघाटातून वर आल्यावर मिळते त्यामुळे वारकऱ्यांचा थकवा नाहिसा होतो आणि वारकरी पंढरीच्या वाटेने मार्गस्थ होण्यासाठी तयार होता. 

वारकऱ्यांच्या पायांना मसाज करून सेवेचा निखळ आनंद आम्ही घेतो. हजारो माऊलींच्या पायांना मसाज करण्याचा हा आनंद आम्हाला शेवटपर्यंत घेता यावा, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो असं मसाज करणाऱ्या महिला सांगतात. दिवे घाट हा सगळ्यात महत्वाचा टप्पा मानला जातो. आज वारकरी तब्बल 35 किलोमीटरचा प्रवास पार करतात. निर्सगातून वारी जाताना विहंगम दृष्य तयार झालं होतं.