महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - सत्तासंघर्षावरून सुरू असलेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आजची सुनावणी नुकतीच संपली असून उद्या पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दोन्ही गटातील वकिलांनी आज जोरदार युक्तीवाद केला. आप-आपली मते मांडताना दोन्ही गटांनीही कायदेशीर दाखले दिले. मूळ राजकीय पक्षाची व्याखाच ठाकरे गटाच्या कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवली तर, शिंदे गटाने सादर केलले्या लेखी युक्तीवादातील कायदेशीर मुद्दे सरन्यायाधिशांना समजले नसल्याने त्यांनी पुन्हा हे मुद्दा उद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष उद्याच्या सुनावणीकडे लागले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीष साळवे, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. दोन्ही गटाला आपली बाजू मांडण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने आज वेळ दिला होता.

१६ आमदारांच्या अपात्रेबाबत शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, शिंदे गटाने आमचाच पक्ष मूळ पक्ष असल्याचा दावा केल्याने याविरोधात जोरदार खडाजंगी सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळाली. मात्र, शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही. विधिमंडळातील बहुमत म्हणजे पक्षावर मालकी नाही असं कपिल सिब्बल म्हणाले. शिंदे गटाचा युक्तीवाद मान्य झाला तर उद्या बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दहाव्या अनुसूचनिनुसार शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलिन होणे किंवा स्वतःचा नवा पक्ष स्थापन करणेच उचित राहील, असं सिब्बल म्हणाले.

निवडणूक आयोगासमोरच शिंदे गटाने शिवसेनेतील फूट मान्य केली आहे. त्यामुळे ते पक्षावर दावा करू शकत नाहीत. नव्या गटाबाबत निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करावं लागेल असंही सिब्बल म्हणाले. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णयही निवडणूक आयोगच ठरवेल. आमदार पात्र आहे की अपात्र हा निर्णय केवळ विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात, असंही सिब्बलांनी स्पष्ट केलं. आपला नेता भेटत नाही म्हणून कोणी नवा पक्ष स्थापन करू शकता का असा प्रश्न सरन्यायाधीशांनी आज सुनावणी दरम्यान उपस्थित केला.

दरम्यान, शिंदे गटाकडून लेखी युक्तीवादही सादर करण्यात आला. मात्र, या लेखी युक्तीवादातून कायदेशीर मुद्दा समजत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुद्दे स्पष्ट होत नसल्याने सुधारित युक्तीवाद द्या. हा युक्तीवाद उद्या दिला तरी चालेल असंही सर्वोच्च न्यायालयाने हरिश साळवे यांना सांगितले. तेव्हा आजच सुधारित युक्तीवाद सादर केला जाईल असं साळवे म्हणाले.