“ग्रामीण-पर्यावरणपूरक जीवनशैलीचा” पुणेकर घेणार अनुभव

“ग्रामीण-पर्यावरणपूरक जीवनशैलीचा” पुणेकर घेणार अनुभव

'वनराई'च्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन

पुणे, (प्रबोधन न्यूज) - वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि बदललेली जीवनशैली यामुळे विविध प्रकारच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन निसर्गाचा विनाश होत आहे. तसेच मानवी आरोग्यावर देखील याचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू नये, यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचे आचरण करण्याची गरज लक्षात घेऊन वनराई संस्थेने यंदाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. वनराई संस्थेच्या आवारात मित्र मंडळ चौक, पर्वती येथे हे प्रदर्शन रविवार, दिनांक १० जुलै रोजी सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

प्रदर्शनात प्रामुख्याने सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, बायोगॅस, निर्धूर चुली, बांबूची सायकल, तसेच बांबू, दगड व मातीच्या पर्यायी वस्तू, पर्यावरणविषयक पुस्तके, मासिके, परसबागेत, छतावर व बाल्कनीत विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन व त्याबाबतची उत्पादने, देशी बियाणे, इलेक्ट्रीक सायकल, रसायनविरहीत व विषमुक्त दैनंदिन गृहोपयोगी वस्तू, ग्रीन हिल्स, पुणे यांचे पर्यावरणविषयक चित्र व वस्तूंचे दालन इत्यादींचा समावेश या प्रदर्शनात असेल. याशिवाय ‘आयुष आपके द्वार’ मोहीमेअंतर्गत भारत सरकारच्या 'आयुष मंत्रालया'चे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्रातर्फे सर्व नागरिकांना वनौषधी रोपांचे निःशुल्क वाटप करण्यात येणार आहे.

 वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, 'सर्वांसाठी आरोग्य' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या हेतूने निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी पर्यावरण प्रदर्शनात विशेष गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण विकासविषयक जनजागृती व समाजप्रबोधन घडवून आणण्यासाठी “वनराई” संस्था नेहमी कार्यरत असते. कृषी-ग्रामीण विकासाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पाठबळ मिळावं, या हेतूने ‘स्नेहमेळावा आणि पर्यावरण प्रदर्शनाचे’ दरवर्षी वर्धापनदिनी आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, सरपंच, पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थी या स्नेहमेळाव्याला आणि प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावतात. यंदा “ग्रामीण-पर्यावरणपूरक जीवनशैली” या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

वनराईचे सचिव अमित वाडेकर म्हणाले की, घराच्या अंगणात, परसबागेत, इमारतींच्या छतांवर किंवा बाल्कन्यांमध्ये लागवड करू इच्छिणारे वृक्षप्रेमी, शेतकरी या सर्वांना गावरान-देशी बियाणांबाबत माहिती मिळावी, तसेच ते विकत घेता यावे आणि या बियाणांच्या संवर्धनाला हातभार लागावा, याबरोबरच दुर्मीळ औषधी वनस्पतींचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन व्हावे. याकरिता या प्रदर्शनातून विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक, थर्माकोल व इतर प्रदूषणकारी वस्तूंना पर्याय या प्रदर्शनात पहायला मिळतील.