शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर थाप, हस्तांदोलनही केलं

शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर थाप, हस्तांदोलनही केलं

    पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चर्चा होती ती शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची. कारण या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला होता. मंचावर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना हस्तांदोलन केलं. त्यानंतर पंतप्रधान पुढच्या सन्माननीय पाहुण्यांकडे जात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर थाप दिली.

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे शहरात झाला. लाल महालात शिवाजी महाराज यांचे बालपण गेलं. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम पुण्यात झालं. रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम हे पुण्यानं केलं हा इतिहास आहे.

पहिलं सर्जीकल स्ट्राईक शिवाजी महाराज यांचं

शरद पवार यांनी सांगितलं की, देशात अलीकडे सर्जीकल स्ट्राईक झाला. सर्जीकल स्ट्राईकची चर्चा आता होते. पण, देशात पहिलं सर्जीकल स्टाईक हे शिवाजी महाराज यांनी केलं होतं. लाल महालाल शाहिस्त्यखानाची बोटं छाटली होती. हे गोष्ट देश विसरू शकत नाही. असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाळ्या वाजवल्या.

पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये

१८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली. स्वराज्य स्थापन करायचं असेल तर लोकांना जागृत केलं पाहिजे. त्यासाठी जबरदस्त शस्त्र म्हणजे पत्रकारिता. लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेत केसरी, तर इंग्रजीत मराठा साप्ताहिक सुरू केलं. या माध्यमातून टिळकांनी इंग्रजांवर प्रहार केले. केसरीचा अर्थ सिंह आहे. त्या माध्यमातून टिळकांनी परकीय लोकांवर प्रहार केला. पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये. दबावात न येता पत्रकारिता केली गेली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हंटलं.

टिळक पुरस्काराला वेगळं महत्त्व

१९८५ साली काँग्रेसचा जन्म झाला. पहिलं अधिवेशन पुण्यात होणार होतं. पण, प्लेगची साथ आली. त्यामुळे दुसरीकडं अधिवेशन झालं. गणेश उत्सव, शिवजयंती या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी नवीन इतिहास तयार करण्याचं काम त्यांनी केलं. टिळक युग आणि दुसरं गांधी युग होतं. दोघांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. नव्या पिढीला या कर्तुत्ववान व्यक्ती प्रेरणा देतील. या पार्श्वभूमीवर टिळक पुरस्काराला आगळं वेगळं असं महत्त्व आहे.

नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

इंदिरा गांधी, खान अब्दुल खान गफार, बाळासाहेब देवरस, शंकर दयाल शर्मा, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांनाही टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्या नावांमध्ये नरेंद्र मोदी यांची भर पडली. याबद्दल सर्वांच्या वतीनं अंतःकरणातून अभिनंदन करतो, असंही शरद पवार म्हणाले.