प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो - झी टॉकिजफेम कलावंत अजितकुमार कोष्टी

प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो - झी टॉकिजफेम कलावंत अजितकुमार कोष्टी

पिंपरी-चिंचवड, दि. 30 मे - "विनोदाला विषय नसतो; तर प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो!" असे प्रतिपादन झी टॉकिजफेम एकपात्री कलावंत अजितकुमार कोष्टी यांनी संजय काळे क्रीडांगण, आकुर्डी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २९ मे २०२२ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत हसवणूक' या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथम पुष्प गुंफताना अजितकुमार कोष्टी बोलत होते.

माजी नगरसेविका शर्मिला बाबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजक अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ज्ञानेश्वरी आणि कुराण या धर्मग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मधुश्रीचे सचिव राजेंद्र बाबर यांनी प्रास्ताविकातून बाराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मधुश्री व्याख्यानमालेची माहिती दिली.

अजित देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. व्याख्यानापूर्वी, एकपात्री कलाकार नंदकुमार कांबळे यांनी नकलांचा कार्यक्रम सादर केला; तसेच यावेळी ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत सिद्ध केल्याबद्दल जगन्नाथ वैद्य यांना सन्मानित करण्यात आले.

अजितकुमार कोष्टी पुढे म्हणाले की, “प्रत्येक माणसाच्या जीवनात ताणतणाव, विवंचना असतात; पण हसण्यामुळे जगणे सुखकर होते. 'गण्या' या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून अजितकुमार कोष्टी यांनी माणसांचा कंजूषपणा, बायकोचा संशयी स्वभाव, नवऱ्याचा इरसालपणा, कोरोना काळात घडलेल्या गमतीजमती, ट्रकच्या मागच्या बाजूस लिहिलेली खुमासदार सुभाषिते, एस.टी. स्टँडवरील चमत्कारिक उद्घोषणा, प्रवासातील प्रासंगिक विनोद, दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या भूमिका केल्यास घडणारे संभाव्य विनोद, प्राण्यांनी माणसांचे अनुकरण केल्याने होणारी धमाल, लहान मुलांच्या निरागस वागण्यातून नकळत घडणारे विनोदी प्रसंग, विजेचे भारनियमन, शिक्षकांनी केलेली जनगणना तसेच मुलगी बघण्याचा कार्यक्रम ते मधुचंद्र अशा विविध विषयांवर विनोद, चुटके, किस्से, मार्मिक टिप्पणी यांचे साभिनय कथन करीत सुमारे दीड तास श्रोत्यांना मनमुराद हसवले.

कार्यक्रमाचा समारोप करताना, "हसण्यामुळे शारीरिक व्याधींचे निर्मूलन होत नसले तरी खळखळून हसताना माणूस वेदना विसरतो आणि त्याची सहनशक्ती वाढते!” असे विचार कोष्टी यांनी मांडले. उज्ज्वला केळकर, चंद्रशेखर जोशी, विनायक गुहे, अश्विनी कुलकर्णी, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात सहकार्य केले. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. रेणुका हजारे यांनी आभार मानले.