सांप्रदायिकते विरोधात शिवबा-फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्त्यांची वज्रमूठ

सांप्रदायिकते विरोधात शिवबा-फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्त्यांची वज्रमूठ
सांप्रदायिकते विरोधात शिवबा-फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्त्यांची वज्रमूठ

एकात्मतेसाठी संविधान प्रचार व कृती कार्यक्रम राबविणार; चर्चासत्रातील निर्णय

पिंपरी-चिंचवड, दि. २५ एप्रिल -  मागील काही वर्षांपासून देशामध्ये विशिष्ट समूहांनी डोके वर काढले असून, मोठ्या प्रमाणावर धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून देशातील शांततेचे व सदभावनेचे वातावरण दूषित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी पिंपरी चिचंवड मधील अपना वतन संघटनेच्या वतीने चिंचवड येथील आनंदीबाई डोके सभागृहामध्ये देशातील वाढती सांप्रदायिकता व राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रामध्ये शिवबा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान सांप्रदायिकतावादाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. त्यामध्ये भारतातील सांप्रदायवादाचे मूळ कारण, सांप्रदायिक दंगलींमध्ये झालेली मनुष्य व वित्तहानी, भारतामध्ये सण २०१४ नंतर वाढलेले दलित, ख्रिश्चन व मुस्लिमांवरील अत्याचार, धार्मिक स्थळांवरील हल्ले, सांप्रदायिकतावादामुळे समाजाचे व देशाचे होणारे नुकसान, अशा घटनांमध्ये न्यायालये, सरकारे, प्रशासकीय व पोलीस यंत्रणांची भूमिका, सांप्रदायिकता वादावर उपाययोजना, राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना व यासाठी शहर पातळीवर कृती कार्यक्रम अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

धार्मिक व जातीय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी त्याविरोधात ठोस भूमिका घेऊन त्याचा प्रतिकार करणे, शहर पातळीवर घराघरात संविधान प्रचार करून नागरिकांना त्यांच्या अधिकाराची व हक्कांची जाणीव करून देणे, विभागानुसार भाईचारा कमिटी स्थापन करणे, शांतता मार्च, एकता मार्च, तिरंगा मार्च यांसारखे उपक्रम राबवणे, सर्व नागरिकांमध्ये परस्पर प्रेम व बंधुभाव वाढवण्यासाठी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना संविधान प्रचार सारख्या उपक्रमात सामील करून घेणे अशा उपाययोजना करून ठोस कृती कार्यक्रम राबविण्याबबाबत निर्णय घेण्यात आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे यांनी सांप्रदायिकतावादा विरोधात प्रतिकार करण्यासाठी शिवबा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठा लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी सांगितले की, आपण आज करत असलेली चर्चा ठोस कृती पर्यंत आली पहिजे. देशातील सध्याच्या अराजकतेच्या वातावरणात प्रत्येकाने आपापल्या जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या लोकांना जागृत करून संप्रदायिकतेचा विरोध केला पाहिजे.

युक्रांदचे महाराष्ट्र कार्यवाहक संदीप बर्वे म्हणाले की, केवळ धार्मिक व राजकीय स्वार्थासाठी जातीयवादी द्वेषमूलक संघटना तरुणांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित करीत आहेत. त्या तरुणांमध्ये जाऊन महाविद्यालये, शाळांमध्ये जाऊन आपण त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. 

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सांप्रदायिकतेपासून देशाला वाचवण्यासाठी भारतीय संविधान हातात घेऊन देशातील स्त्री पुरुष सर्वाना सामान न्याय व विकासाच्या सामान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यामुळे कोणाच्याही मनात असुरक्षिततेची व अन्यायाची  भावना निर्माण होणार नाही तसेच त्यामुळे आपापसातील प्रेम व बंधुभाव वाढीस लागेल व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील.

या चर्चासत्रात बारा बलुतेदार महासंघाचे प्रतापराव गुरव, माजी नगरसेवक मारुती भापकर, युक्रांदच्या नीलम पंडित, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब वाघमारे, मीना सरोदे, भारतीय एकात्मता संघटनेचे इस्माईल शेख, मुराद अली शेख, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, सत्यशोधक परिषदेचे सुरेश गायकवाड, संवाद व्यासपीठाचे हरीश मोरे, इंडियन मुस्लिम फ्रंटचे गौस शेख, इम्रान शेख, नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीत शहा, भीमा कोरेगाव संघर्ष समितीच्या अनिता साळवे, एमआयएमचे धम्मराज साळवे, संतोष शिंदे, आरपीआयचे विशाल कदम, मयूर जैस्वाल, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, संकल्प युवा फाउंडेशनचे गणेश जगताप, रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे ,महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे शहाबुद्दीन शेख ,जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदचे संतोष बदाडे, लतीफ सय्यद, अखिल सलमानी विकास संस्थेचे रऊफ शेख, वेल्फेर पार्टी ऑफ इंडियाचे सालार शेख, फिरोज तांबोळी, माउली बोराटे, दीपक कांबळे आदीजण उपस्थित होते.

या चर्चासत्राचे आयोजन अपना वतन संघटनेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा, कार्याध्यक्ष हमीद शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक प्रकाश पठारे, तौफिक पठाण, अस्लम शेख, अल्ताफ शेख, वासिम पठाण आदींनी केले.