गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ कमांडोची मोठी कारवाई; 26 नक्षलवादी ठार, नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचाही अंत
![गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ कमांडोची मोठी कारवाई; 26 नक्षलवादी ठार, नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचाही अंत](https://prabodhannews.com/uploads/images/2021/11/image_750x_6190acb3aecf7.jpg)
गडचिरोली -
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. गडचिरोली पोलिसांनी या माहिती दुजोरा दिला आहे. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.
कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सी-६० नक्षलविरोधी अभियान पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यांना पोलिसांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. चकमक तीन ते चार तास सुरू होती. पोलिसांपुढे निभाव लागत नसल्याचे लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
चकमकीनंतर घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर नक्षलविरोधी अभियान पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत १० ते १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र नक्षलविरोधी अभियान पथकाने जंगलात शोध घेतला असता रक्ताचा सडा आढळला. त्यानंतर घनदाट जंगलात शोध घेण्यात आला असता नक्षलवाद्यांचे आणखी १४ मृतदेह आढळले.