शेतकऱ्यांऐवजी अदानींचे कौतुक केल्याने सदाभाऊ खोत शरद पवारांवर संतापले

शेतकऱ्यांऐवजी अदानींचे कौतुक केल्याने सदाभाऊ खोत शरद पवारांवर संतापले

‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक

मुंबई (प्रबोधन न्यूज) - सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दाखला देत पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पवारांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. पवारांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं करण्यात आले आहे यावरून त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले गौतम अदाणी हे सध्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, देशातील प्रचंड श्रीमंत उद्योजक असलेल्या अदानींचा इथवरचा प्रवास काही फार सोपा नव्हता. कारण स्वत: अदानी हे कधी काळी मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करायचे. असे अदानींचे अनेक किस्से शरद पवार यांनी लोक माझा सांगाती या पुस्तकात लिहिले आहेत.

शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात गौतम अदानींबाबतचा एक किस्सा लिहला आहे. ज्यात ते गौतम अदानींना खूप पूर्वीपासून ओळखत असल्याचं म्हणतात. शरद पवार यांनी म्हटले आहे की, या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता.'

पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एक जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे.'

वीज निर्मितीत उतरण्याचा शरद पवार यांनी दिला सल्ला

'गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, 'वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर उर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.' एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो, 'उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो, की उर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.' गौतमनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला.'

'सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात उर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.' असा संपूर्ण किस्साच शरद पवारांनी आपल्या पुस्तकात सांगितला आहे.

शरद पवारांसोबतही अदाणींचे चांगले संबंध असल्याचं वरच्या किस्सावरुन आपल्याला लक्षात येईलच. साधारण दीड वर्षापूर्वी शरद पवार यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक गुप्त भेट झाल्याची बातमी समोर आली होती. पण ही भेट गौतम अदाणींच्या घरी झाल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी रंगली होती.