आगामी निवडणुकाही काँग्रेस स्वबळावर लढणार - नाना पटोले

आगामी निवडणुकाही काँग्रेस स्वबळावर लढणार - नाना पटोले


कोकण - आतापर्यंत काँग्रेसला चौथ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून हिणवणाऱयांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चोख उत्तर मिळाले आहे. महाराष्ट्र काँग्रेस विचारांचे राज्य असून यापुढेही काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचून महाराष्ट्र काँग्रेसमय करण्याचा आराखडा आहे. त्यानुसार ताकदीने उभे राहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकाही स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

संगमेश्वर दौऱयावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे येथील रेल्वेस्थानकावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यानंतर हॉटेल रिम्झ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुका आणि राज्यातील स्थिती या बाबत ते म्हणाले की, काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमी जनतेच्या संपर्कात असले पाहिजेत. काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचून पक्ष ताकदीने उभा राहण्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सुरूवातीला मांडलेल्या भूमिकेला जनतेने आशीर्वाद दिल्याने कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष क्रमांक 1वर आला. मागील चुका दुरूस्त करून आता पुढे जात आहोत. केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी कायद्याविरोधात 14 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सप्ताह साजरा करत असून त्यात विविध आंदोलनाबरोबरच मुंबई-गोवा महामार्ग खड्डय़ांबाबत रायगड ते सिंधुदुर्गापर्यंत आंदोलन करणार आहे.

सध्याच्या गाजत असलेल्या पूररेषेसंदर्भात ते म्हणाले की, चिपळूण शहर नव्याने वसलेले नाही. अनेक पावसाळे, पूर या शहराने पाहिले आहेत. पण या घटना अलिकडच्या काळात घडत आहेत. मात्र या संदर्भातील निळी व लाल रेषा निर्माण करून चिपळूण आणि कोकणच्या विकासाचे नुकसान होत असेल तर त्या रेषा रद्द केल्या पाहिजेत. शहरवासीयाच्या भावना यापूर्वीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे कळवलेल्या आहेत. या संदर्भात बैठकही झाली आहे. पूर पुन्हा येऊ नये, या दृष्टीने करण्यात येणाऱया उपाययोजनांवरही चर्चा झाली आहे.

महापुरातील मदतीबाबत ते म्हणाले की, कागदपत्र विचारत न बसता सरसकट मदत मिळाली पाहिजे. राज्यावर गेले 3 वर्षे सातत्याने आपत्ती येत असतानाही राज्याला मदतच करायची नाही, असे धोरण केंद्राने घेतल्याचे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा 2014पासून दुरूपयोग सुरू आहे. काँग्रेसने वेळोवेळी या विरोधात भूमिका मांडली आहे. आर्यन खान प्रकरणात कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. शपथ घेऊन खूर्चीवर बसलेल्या अधिकाऱयांनी आपली सेवा चोखपणे बजावावी. केंद्र सरकारची कठपुतळी बनू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.